चतुरस्त्र पौर्णिमा
‘एका स्पर्धेत हरल्यावर दुसर्या स्पर्धेत त्याच ताकदीने उभं राहायचं असतं. स्पर्धा कोणतीही असली तरी त्यात आत्मविश्वास असला पाहिजे. आपलं शिक्षण, काम यासोबत आपल्या कला, छंदही जोपासायला हव्यात,’ असं पौर्णिमा बुद्धीवंत सांगते. आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण केलेली पौर्णिमा सध्या विविध कामात व्यस्त आहे. जॉब, मॉडलिंग, शिक्षण आणि सोबतच समाजकार्यामध्येही ती भरारीने काम करतेय. चतुरस्त्र असलेली पौर्णिमा एवढ्या सार्या भूमिका एकाचवेळी कशी पार पाडते याविषयी आम्ही तिच्याशी गप्पा मारल्या.
दादर येथे राहणार्या पौर्णिमाने रचना संसद येथून आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण केलंय. पण सध्या ती दोन सौंदर्य स्पर्धांची तयारी करतेय. मध्यम कुटुंबियातून आलेल्या मुलींसाठी सौंदर्य स्पर्धा म्हणजे एक दिवा स्वप्नच असतं. मात्र पौर्णिमाने हे मत खोडून काढलंय. आर्किटेक्चर करत असताना अनेक प्रकल्पांमध्ये अव्वल ठरलेल्या पौर्णिमाने शिक्षण संपल्यानंतर एक वेगळा प्रयोग म्हणून फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटला भरभरून प्रतिसाद मिळाला. म्हणून तिने मॉडलिंगही सुरू केली. पहिल्या सौंदर्य स्पर्धेत यश न मिळाल्याने तिने जोमाने पुन्हा सुरुवात केली. त्यानंतर मिस महाराष्ट्र 2018 या स्पर्धेत ती अंतिम फेरीत निवडली गेली होती. पौर्णिमा याविषयी म्हणते की, ‘एखादी स्पर्धा हरल्यावर खचून न जाता त्यातून काय शिकायला मिळतंय हे पाहावं. प्रत्येक स्पर्धेतून काहीतरी नवं शिकायला मिळतं. त्यातूनच आपला आत्मविश्वासात वाढत राहतो.’ मार्च महिन्यात पौर्णिमाच्या दोन सौंदर्य स्पर्धा आहेत. टीजीपीसी मिस इंडिया 2019 आणि मिस इंडिया एक्सिसाईट या स्पर्धांमध्ये तिची निवड झाली आहे. यासाठी तिची सध्या जोरात तयारी सुरू आहे. सौंदर्य स्पर्धांसाठी तयारी करत असताना ती रोज नवनवीन गोष्टी शिकतेय. मागच्या स्पर्धेत आपलं काय चुकलं, आपल्यात काय बदल झाले पाहिजेत, यावर सध्या तिचा अभ्यास सुरू आहे. पण हे करत असताना तिचे इतरही अनेक प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पांविषीय ती सांगते की, ‘मी दादरच्या डॉ.डी.डी.कुलकर्णी या शाळेत शिकले. लहानपणापासूनच मला चित्रकलेची आवड होती. मात्र आमच्यावेळेस चित्रकला शिकवायला फारसं कोणी रस घेत नसे. म्हणून मी माझ्या शाळेत जाऊन छोट्या मित्रांसाठी चित्रकलेची मोफत कार्यशाळा घेते. या कार्यशाळेत कोणीही सहभागी होऊ शकतं. यातूनच मला आत्मिक आनंद मिळतो. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी आपली मदत होतेय याचं मला समाधान मिळतंय.’
कलाविश्वात रमणार्या पौर्णिमाला पर्यावरणाविषयीही प्रचंड आपुलकी आहे. आपण समाजाचं जितकं देणं लागतो तितकंच आपल्या निसर्गाचंही देणं लागतो. भारत हा कृषीप्रधान देश असला तरीही शेतीकडे फार दुर्लक्ष केलं जातंय. म्हणूनच शेतकर्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. म्हणूनच ती सध्या पर्यावरणाचा समतोल कसा राखावा, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन कसं करावं याचा ती अभ्यास करते आहे. पुण्यातील इकोलॉजिकल या संस्थेमधून ‘नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन आणि संसाधन व्यवस्थापन’ या विषयावर ती अभ्यास करतेय. या अभ्यासाविषयी ती सांगते की, ‘आर्किटेक्चरच्या शेवटच्या वर्षात मी शेतीवर एक प्रकल्प केला होता. शेतजमिनीचा अधिक चांगल्या प्रकारे वापर होऊन शेतकर्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल हे त्या प्रकल्पातून मांडण्यात आलं. या प्रकल्पाला ‘मीडिया स्टुन्डंड आर्किटेक्चर अॅण्ड डिजाईन अॅवॉर्ड 2018’चा अर्बन डिजाईन या विभागातंर्गत दुसरा क्रमांकही मिळाला. म्हणून मी या विषयात आणखी शिकण्याचा विचार केला.’
आर्किटेक्चर, मॉडेलिंग, चित्रकलेचे मोफत वर्कशॉप आणि पर्यावरण रक्षणाचा अभ्यास अशा चारही क्षेत्रात पौर्णिमा अत्यंत व्यस्त आहे. ती म्हणते की, ‘या गोष्टींमध्ये मी इतकी समरसून गेले आहे की मला माझ्यासाठी वेगळा वेळ काढावाच लागत नाही. यातूनच मला आनंद मिळतो. माझ्या या व्यस्त वेळापत्रकातही माझ्या आई-बाबांनी मला प्रचंड साथ दिली आहे. त्यामुळे त्यांच्या साथीनेच यापुढेही मी अनेक गोष्टी शिकू शकेन असं मला वाटतं.’
![]() |
दैनिक महाराष्ट्र दिनमान |
Tags- model, marathi model, shravan queen, Miss Maharashtra 2018, TGPC Miss India 2019, online competetion, Miss India Exicite, natural love, Rachana Sansad
Comments
Post a Comment