व्यसनाधिनतेची विनाशकारी दलदल
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी 1992 साली भारताविषयी एक भाकित केलं होतं. 2020 साली भारत हा महासत्ता बनेल आणि भारत महासत्ता बनण्यासाठी भारतातील तरुणच पुढाकार घेतील. 2020 साल उजाडायला आता फक्त एक वर्षांचा अवधी उरला आहे. पण आजच्या तरुणांकडे एक दृष्टीक्षेप टाकला तर आपल्या समोर विदारक सत्य उभे राहिल. तरुणाई नको त्या व्यसनांमध्ये, हव्यासांमध्ये, अतिरेकी लोभांमध्ये लोळते आहे. महाराष्ट्रातही तीच परिस्थिती. राज्य सध्या व्यसनांच्या विळख्यात अडकल्याची माहिती नुकतीच समोर आली. त्यातही तरुणांचा समावेश अधिक आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी किमान चार कोटी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या व्यसनांच्या आहारी गेल्याचा सर्वेक्षण अहवाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचने जाहीर केला. बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव यामुळे लोकांमध्ये व्यसनाधिनता अधिक वाढत चालली असल्याचा निष्कर्ष या अहवालातून समोर आला. गुटखा बंदी होऊन अनेक वर्ष लोटली असली तरीही व्यसनांचा विळखा वाढतोच आहे. महसुलाचा मुद्दा समोर आणत दारूबंदी करण्यास सरकारने नकार दिल्याने प्रत्येकवर्षी जवळपास 45 हजार कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. दारूचे सेवन करणारी व्यक्ती दिवसाला कमीतकमी दोनशे रुपये खर्च करते, यामुळे गरिबीत वाढ होत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. शहरात महाविद्यालये, कॉलेजच्या बाहेर असलेल्या चहा टपरीवर सिगरेटची धुरांडी उडवणारी तरुणाई नेहमीच दिसते. जोडीला तरुणींचाही घोळका असतो. एकच सिगरेट चार-पाच जणांमध्ये फिरवली जाते. कॉलेज तरुणांची ही तर्हा तर शालेय विद्यार्थ्यांची अवस्था याहूनही भयानक. कोवळ्या वयातच अंमली पदार्थांच्या आहारी नवी पिढी गेली आहे. आरोग्याचा, भविष्याचा विचार न करता हे विद्यार्थी सतत अशा पदार्थांच्या शोधातच असतात. त्यासाठी पैसे लागतात आणि पैसे मिळवण्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग त्यांना सोपा वाटतो. पण हाच मार्ग त्यांना विनाशाच्या दलदलीत रुतवत जातो. ठाण्यात अनेक भागांत अमली पदार्थांचा चस्का लागलेली कोवळ्या वयातील मुले अंधारे कोपरे, एकांतातील जागा शोधत असतात. कोपरी खाडी किनारा, मीठागाराचे अंधारे कोपरे, लोकमान्य नगर, इंदिरा नगर आणि इतर भागांत ही टोळकी नशा करतात. जे सर्वसामान्य नागरिकांना दिसते ते पोलिसांना दिसत कसे नाही, या नशेचे पुरवठादार मोकळे कसे याचेच आश्चर्य वाटते.
भायखळाच्या एका नामांकित शाळेतील विद्यार्थी गांजा ओढत असल्याची बाब समोर आली होती. ही बाब समोर येताच त्या शाळेत शिकणार्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या घरातील मुलांना च्युइंगम खाण्याचीही सोय नाही अशाच उच्चशिक्षित घरातील मुलांचा गांजाशी संबंध कसा आणि कुठून आला या चक्रव्युहातच पालक अडकले आहेत. दोन महिन्यांपूर्वी सीएसटीएमच्या फॅशन स्ट्रीटवर अंमली पदार्थांचा पेन विक्री होत असल्याचे समोर आले होते. शहरी काय आणि ग्रामीण काय सर्वच भागांत भीषण परिस्थिती आहे. तंबाखू, दारू, सिगरेट, गांजा, खर्रा, तपकीर, गुटखा, अफू आदी पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दोन दिवसांपूर्वीच मनमाडमध्ये नशेसाठी कुत्ता गोळी खाल्ली जात असल्याचा प्रकार उजेडात आला. मनमाडमधील शालेय विद्यार्थी या कुत्ता गोळीच्या अधीन गेले आहेत. अवघ्या दोन रुपयांत मिळणारी ही नशा औषधांच्या गोळ्यांच्या वेष्टनात गुंडाळली जात असल्याने पालकही याकडे दुर्लक्ष करतात. या कुत्ता गोळीचं मुळ नाव आहे अल्प्रोलोजोम. उत्तेजक पदार्थांपासून या गोळीची निर्मिती होते. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी पेनाच्या इंकपासून तयार झालेली नशाही करतात. ही नशा रुमालात ठेवून भरवर्गात त्याचे सेवन करताना शिक्षकांनी पाहिल्यावर हा प्रकार उघड झाला. तंबाखूच्या पानांमधला अर्क वापरून सिगरेट, खैनी, पान मसाला आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ बनवले जातात. हाच अर्क सिगरेट आणि हुक्क्यांमध्येही वापरला जातो. सिगरेटमधील निकोटिन नामक द्रव्यामुळे हे व्यसन सतत करण्याची इच्छा निर्माण होते. हे निकोटीन शरीरात गेल्यावर अड्रेनलिन निर्माण करते. शरीरातील हे बदल व्यसनाधीन व्यक्तीला एक तल्लख शक्ती प्राप्त केल्याची भावना देतात पण अल्पकाळ. म्हणूनच त्या अत्युच्च आनंदासाठी सतत व्यसन करण्याची इच्छा निर्माण होते. यातून माणूस व्यसनाधीनतेच्या दरीत घसरू लागतो. सध्या महिलांमध्येही व्यसनांचे प्रमाण वाढले आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत आपले वर्चस्व सिद्ध करण्याच्या नादात महिलाही या व्यसनांना कवटाळू लागल्या आहेत. व्यसनमुक्ती संस्था, यंत्रणांचे प्रयत्न अपुरे पडत चालले आहेत. या विनाशकारी दलदलीत आपली तरुणाई पूर्णपणे नाहिशी होण्यापूर्वीच सरकारने महसूलवाढ बाजूला ठेवून कठोर उपाय आणि कायदे अमलात आणायला हवेत.
Comments
Post a Comment